धाराशिव, दि. ३ जून (प्रतिनिधी):
धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले कत्तलखाने आज सकाळी संयुक्त कारवाईत निष्कासित करण्यात आले. पोलीस विभाग, महसूल प्रशासन आणि नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने सकाळी १० ते १२ दरम्यान ही कारवाई राबवली.
शहर हद्दीतील सर्वे नं. ४२९ येथे गोपनीय माहितीच्या आधारे कार्यवाही करण्यात आली. गौवंश तस्करी व अनधिकृत कत्तलखाने चालवणाऱ्या गटांनी उभारलेली चार ठिकाणांची संरचना पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईत JCB, ट्रॅक्टर व पोलीस बंदोबस्ताची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
ही महत्त्वपूर्ण कारवाई धाराशिव शहर पोलीस निरीक्षक शकील शेख, नायब तहसीलदार श्री. शिंदे, आणि नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत कर्मचारी आणि आवश्यक यंत्रणाही कार्यस्थळी उपस्थित होते.
या संयुक्त मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक मा. शाफकत आमना, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई शहरात बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल मानली जात आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अशा कारवायांचे सत्र पुढेही सुरू राहणार असून अनधिकृत धंद्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.