बळीराजाला दिलासा.
मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च २०२० मध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाई पोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मंजूर. - आमदार कैलास पाटील
नैसर्गिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. एक फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा, पाऊस व गारपीठ यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या सरकारने मंजुर केली आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ९४५ इतकी होती. त्यातील एकट्या कळंब तालुक्यातील बाधितांची संख्या २९ हजार ९२७ एवढी आहे. कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजुर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये २४ हजार ५६९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेले होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्ह्यास्तरीय, तालुक्यास्तरीय अधिकारी यांच्यासोबत त्यावेळी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती, शेतकऱ्यांशी संवाद साधुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्ताना भरपाई मंजुर झाली आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्याना मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधिताना मदत देण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या १६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधीची प्रतिक्षा होती, जिल्ह्यासाठी २० कोटी ५८ लाखाचा निधी मिळाला असुन कळंब तालुक्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याने कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही मदतीची रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे याबाबत सातत्याने खासदार ओमदादांसोबत पाठपुरावा केला होता. अखेर फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवेळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले. निधीची तरतुद देखील करण्यात आली आहे. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना.अजित दादा पवार, युवासेनाप्रमुख, पर्यटनमंत्री ना.आदित्यजी ठाकरे, मदत व पुर्नवसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार जी, राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे जी यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने मनःपूर्वक आभार! अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पेज द्वारे दिली आहे.