ओबीसींची जात निहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
उस्मानाबाद दि.१७ (प्रतिनिधी) - बिहार राज्याप्रमाणे ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी यासह इतर मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.१७ मार्च रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाची संलग्न विविध महामंडळाची कर्ज माफ करून शासन दरबारी व मागे घेण्यात याव्यात, राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा, महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृह सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच २०१३ साली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने अन्नसुरक्षा विधेयक पारित केल्या प्रमाणे प्रत्येक गरीबांची उपासमार टाळण्यासाठी कायदा बनून सोय केली होती. परंतू सध्याचे मोदी सरकार १५० रुपये देऊन लोकांची उपासमार करण्याचे धोरण आखत आहे. त्यामुळे तसे न करता गरिबाला रेशन दुकानातूनच धान्य देण्यात यावे यांसह इतर मागण्या करण्यात आले आहेत. ओबीसींच्या विविध मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार विनंती काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे मात्र अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही या मागण्या पूर्ण न झाल्यास काँग्रेसच्यावतीने दि.१५ मे पासून संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष दौलतराव माने, प्रशांत पाटील, सचिव महेबुब पटेल, अंकुश पेठे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, संजय गजधने, उमेशराजे निंबाळकर, आश्रुबा माळी, काकासाहेब सोनटक्के, सचिन धाकतोडे, अभिजीत देडे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.
पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही !
काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र पदाधिकाऱ्यांना त्या कार्यक्रमाची पूर्व कल्पना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली जात नाही. त्याऐवजी मोजक्या पदाधिकाऱ्यांना १०-१५ मिनिटांपूर्वी कार्यक्रम असल्याचे फोनद्वारे कळविले जाते. असाच प्रकार आजच्या निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद यांच्याबाबतीत घडला. निवेदन देण्यापूर्वी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर काँग्रेसच्यावतीने निवेदन द्यायचे असल्यामुळे तुम्ही लवकर या असे फोनद्वारे सांगण्यात आले. सय्यद यांनी १० मिनिटांमध्ये येतो असे सांगून ते ७ व्या मिनिटांमध्ये आले. तोपर्यंत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे सय्यद व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षात बेबनाव असल्याचे जनतेसमोर आल्याने हा बेबनाव नेमका कशासाठी व का केला जात आहे ? अशी चर्चा दिवसभर परिसरात सुरु होती.