रेशन कार्डची ऑनलाईन नोंदणी केल्यास शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकास होईल - आ. कैलास पाटील
उस्मानाबाद,दि.09(जिमाका):- अनेकांकडे रेशन कार्ड आहेत. मात्र त्या कार्डांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधिताना स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित केले जाणारे धान्य मिळत नाही. तसेच शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभही मिळत नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने त्या रेशन कार्डची ऑनलाईन नोंदणी करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यास रेशन बाबतच्या सर्व तक्रारींचे निराकरण होऊन शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचण्यास मदत होईल, असे मत आमदार कैलास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरवठा विभागाच्यावतीने सर्वांना रेशन कार्ड मिळावे यासाठी, ‘माझी शिधापत्रिका माझा हक्क’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन आमदार श्री. पाटील आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.चारुशिला देशमुख, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार राजाराम केलूरकर, तुषार बोरकर, जिल्हा पुरवठा निरीक्षक अधिकारी सचिन काळे आदी उपस्थित होते.
सगळ्यांची गरज लक्षात घेऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि जिल्हाधिकारी श्री .दिवेगावकर यांनी असे शिबिर प्रत्येक मंडळ स्तरावर राबवावेत अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रेशनचे जे लाभार्थी आहेत त्यांना नवीन रेशन कार्ड कसे देता येईल ? त्यासाठी महसूल यंत्रणेने प्रयत्न करावेत. पुरवठा विभागाने हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे, असे सांगून आ.पाटील यांनी उस्मानाबादच्या तहसीलदारांचे विशेष अभिनंदन केले. पुरवठा विभागाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला आहे. तर रेशन दुकानदारांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पुरवठा विभागामार्फत केले जातात. परंतु पहिल्यांदाच ज्यांनी चांगल्या प्रकारे धान्य वाटप केले आहे , त्यांचा सत्कार या कार्यक्रमात केल्यामुळे ते चांगले काम केल्यास जिल्हा प्रशासन नक्की पाठीशी असते, हा संदेश यातून दिला गेला आहे , असेही ते म्हणाले .
रेशन कार्ड बरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचा अर्ज या अभियानातून गावोगावी भरून घेऊन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामुळे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी दाखल होताना त्याच्या नातेवाईकांची धावपळ होणार नाही. तसेच त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळण्यास होणारी अडचण दूर होतील. यासाठीही पुरवठा व जिहा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. पाटील यांनी यावेळी केले.
अन्नसुरक्षा योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत. परंतु त्या योजनेत नाहीत अशांची गरज ओळखून त्यांचा त्या योजनेत समावेश करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी जबाबदारी घ्यावी, असे सांगून आ.पाटील यांनी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे परंतु त्याची ऑनलाईन नोंदणी न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. त्यासाठी ते कार्ड ऑनलाईन करून घेण्याची जबाबदारी पुरवठा विभागाने घेतल्यास रेशन बाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील.
कोविडच्या काळामध्ये पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार यांनी मोलाची कामगिरी बजावत लोकांपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचविण्याचे महत्वाचे काम जिकिरीने केले आहे. त्या काळातही आपण ऑनलाईन बायोमेट्रिक पद्धतीने अन्नधान्य वितरित केले आहे. ही खरंच खूप मोलाची कामगिरी आपण सर्वांनी बजावली. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असे म्हणत जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी पुरवठा विभागाला वारंवार काही ना काही तक्रारींना तोंड द्यावे लागते. परंतु गरिबातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहचणारा विभाग म्हणजे पुरवठा विभाग होय . याबाबत खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे लोक तक्रार घेऊन जातात.
त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून विचार केला की, प्रशासन आपल्या दारी या पद्धतीने काम केल्याशिवाय पुरवठा विभागातील अडचणी दूर होणार नाहीत. त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरवठा विभागातील जी वेगवेगळी प्रमाणपत्र आहेत. त्या प्रमाणपत्रांचे आणि शिधापत्रिकांचे वितरणही मंडळ मुख्यालय स्तरावर केले पाहिजे. त्याप्रमाणे हा पहिला कार्यक्रम उस्मानाबाद तहसीलदारांनी आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम घेऊन संपणार नाही त्यासाठी संपूर्ण जिल्हात असे कार्यमर्म घेतले जातील असेही श्री. दिवेगावकर म्हणाले .
विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये शेती उद्योगधंदे या सर्वांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. मात्र अशा काळामध्ये अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहणे आणि भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे , असे सांगून जिल्हाधिकारी श्री .दिवेगावकर यांनी
आ.पाटील यांनी या पार्श्वभूमीवर जन आरोग्य योजनेसाठी जे प्रमाणपत्र लागते ते पुरवठा उभागाच्या या उपक्रमातून देण्याची अपेक्षा व्यक्त केली ती स्वागतार्ह आहे .
आपण आशा कार्यक्रमांमधून त्याबाबतचे अर्ज भरून घेऊन आशा शिबिरातूनच त्यांचे वाटप केले तर जनतेला दिलासा मिळणार आहे . त्यामुळे या सूचनेची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल ,असं आश्वासनही जिल्हाधिकारी यांना यावेळी दिले.
शासनाने ठरवून दिलेल्या उपक्रमानुसार जास्तीत जास्त बायोमेट्रिक केलेल्या दुकानदारांचा सत्कार करावा. त्यामुळे बायोमेट्रिक केल्यानंतर किती लाभार्थ्यांना आपण धान्य दिले याचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध राहते. या मोहिमेस बळकटी मिळावी आणि रेशन दुकानदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार प्रतिनिधिक स्वरुपात करण्यात आल्याचे श्री.दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले.
*****