उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कृती समितीच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहे. या समितीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून उस्मानाबादचे नामांतर होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबु आझमी यांनी केले.
उस्मानाबाद येथे शनिवारी सायंकाळी नामांतरविरोधी कृती समितीच्या बैठकीस आ.अबु आझमी यांनी संबोधीत केले. यावेळी ते बोलत होते. आझमी म्हणाले, धाराशीव नावाचा आम्ही द्वेष करत नाही. परंतु ज्या निजाम मीर उस्मानअली यांनी शिक्षणासाठी विद्यापीठाची स्थापना केली. याच विद्यापीठात देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या महान व्यक्तींनी शिक्षण घेतले. भारत-चीन युद्धाच्या वेळी देश संकटात असताना स्वतःकडील सहा टन सोने त्यांनी देशासाठी दिले. त्यांच्या नावाला विरोध करण्याचे कारण काय? महाविकास आघाडी सरकारचे किमान समान धोरण असताना मंत्रीमंडळ बैठकीत नामांतराच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी गप्प का राहिली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हा देश मुस्लिम बांधवांचा देखील आहे. देशात हिंदू-मुस्लिम बंधुभाव कायम राहिला पाहिजे. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न सोडविण्याऐवजी समाजाला खुश करण्यासाठी शहराची नावे बदलण्याचे राजकारण केले जात असल्याची टिका आझमी यांनी केली.
या बैठकीला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, मसूद शेख, खलिफा कुरेशी, कादर खान, मैनूदिन पठाण, समियोद्दीन मशायक, बाबा मुजावर, महमूद मुजावर, जमील सय्यद, मूहिब अहमद, आरिफ शेख, आरिफ मुल्ला, इरफान कुरेशी, सादिक कुरेशी, एएमआयएमचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा पठाण, मोहसीन शेख, अजहर पठाण, शेख अलीम एल डी, उस्मान कुरेशी जमीर शेख मुनिर कुरेशी जाकर पठाण, लाईक सरकार, गफ्फारभाई शेख, इलियास अबदार, अॅड. कचुर मोगल, अस्लम मुजावर, कलीम कुरेशी, नजीब राहेमान, कफील सय्यद, मैनू खर्ची, इस्माईल काझी यांच्यासह विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव उपस्थित होते.