साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
व्हिडीओ कॉन्फरसिंग माध्यमातून साथरोग नियंत्रण बैठकीत आरोग्य मंत्र्यांकडून आढावा.
सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भितीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेतलेल्या साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.
या बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर,आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, आरोग्य विभागाचे संचालक नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तर राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थित होते. राज्यातील मलेरीया, डेंग्यू, चिकनगुण्या आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढीची कारणे व उपाययोजनांवर चर्चा झाली.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला किंवा बऱ्यापैकी साथरोगांचे रूग्ण मिळत आहेत, अशा भागात साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रूम सोबत संलग्न असावी. वॉर रूमला साथरोग रूग्णांबाबत, फैलावाबाबत 24 तासात माहिती द्यावी. जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती स्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटूंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकही करावे.
साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा नियमितरित्या करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. सावंत म्हणाले, औषधांचा पुरवठा कुठेही बाधीत होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा. त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मलेरीया रूग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. धूर फवारणी नियमित करावी. बांधकामांमुळे पाणी साचून किटकजन्य आजारांमधील वाढ लक्षात घेता, मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेवून पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
अप्पर मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथरोगांच्याबाबत जनजागृतीवर भर देवून नागरिकांना याबाबत शिक्षीत करण्याच्या सुचना दिल्या. आयुक्त धीरजकुमार म्हणाले, पाणी नमुने तपासणी महत्वाचे आहे. दुषीत पाणी नमूना आल्यास त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करावी. रक्त नमुन्यांचे संकलन वाढवावे. मलेरीया, डेंग्यू व चिकुनगुण्या रूग्णांची तपासणी वाढवावी. नितीन अंबाडेकर यांनी बैठकीत साथरोगांच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.