वाशी (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील वाशी शहर, घोडकी, घाटपिंपरी तसेच फाकराबाद परिसर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीचा सामना करत आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, वीजपुरवठा व वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेले असून अनेक ठिकाणी घराची पडझड झाली आहे. या परिस्थितीची आज खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत पत्राव्दारे आदेशीत केले.
यावेळी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रभावित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
आपत्तीच्या या काळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, संयम ठेवावा व सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले. पाहणीदरम्यान जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख तात्या गायकवाड, तहसीलदार म्हेत्रे साहेब, युवासेना तालुकाप्रमुख गणेश भराटे, शहरप्रमुख अनिल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.