धाराशिव दि.१० सप्टेंबर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीने दि.११ सप्टेंबर रोजी सिद्धाई मंगल कार्यालय,धाराशिव येथे सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने होईल.त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक होणार असून,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष हे अभियानाविषयी सादरीकरण करणार आहेत.जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत प्रमुख मार्गदर्शन करतील.
यावेळी पंचायत स्तरावरील सुशासन,सक्षम पंचायत,जनजागृती या विषयावर पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुरुडचे प्राचार्य महेंद्र पांगळ,जलसमृद्ध स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे,मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत,गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे या विषयावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, उपजीविका विकास व सामाजिक न्याय या विषयावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गुरु भांगे हे मार्गदर्शन करणार आहे.
तसेच १५ वा वित्त आयोग,लेखे व्यवस्थापन व लेखापरीक्षण या विषयांवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे,लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे यावर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रा.गणेश चादरे मार्गदर्शन करतील.यानंतर सरपंचांचे मनोगत सादर होईल.
कार्यशाळेदरम्यान राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळालेल्या सरपंचांचा तसेच राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यशाळेचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल,अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार यांनी दिली.


