आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! - सौ नेहा राहुल काकडे
पुण्यातील कचरा प्रक्रिया केंद्राला दिली भेट
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने दि.१० मार्च रोजी भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र ( प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. यावेळी कंपनीच्यावतीने आसाराम काळे यांनी शिष्टमंडळास कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ? त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर होऊन त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो ? याची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच धाराशिव येथील कचरा डेपो संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील ? यासंदर्भात शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ज्या पद्धतीने पुणे येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून येथील कचऱ्याच्या समस्या सोडविल्या आहेत. अगदी तसाच प्रयोग धाराशिव येथील कचरा डेपोच्या संदर्भात केला जाईल असे आश्वासन काळे यांनी दिले. त्यामुळे
धाराशिवमधील कचरा डेपोतील कचऱ्यामुळे उद्भवलेल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील. त्या संदर्भात नगर परिषदेकडून सकारात्मक ठोस आणि सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लवकरच धाराशिवमधील कचरा डेपोमधील कचऱ्यावर प्रक्रिया (प्रोसेस) करून या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून निर्माण होणाऱ्या सर्व समस्या लवकरच निश्चितपणे संपुष्टात आणण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे व मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली आहे. तसेच या कचऱ्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्येवर कायमस्वरूपी इलाज केला जाणार आहे. विशेष म्हणजे नगर पालिका निवडणूक प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीच्या दिशेने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे काकडे यांनी आवर्जून सांगितले. तसेच कचरा डेपो आणि कचऱ्यावरून होणारे राजकारण यापुढे कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी सांगितले. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष काकडे यांच्यासह स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक आकाश तावडे, राहुल काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, उप मुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे आदी उपस्थित होते.
शहरवासियांची कचऱ्याच्या त्रासापासून कायमची मुक्तता करणार
धाराशिव शहरातील कचरा व कचरा डेपोचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विशेषता ज्येष्ठ नागरिक व लहान बालकांना याचा प्रचंड आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका करण्यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून या संदर्भात ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता फक्त शहरवासियांच्या हिताला प्राधान्य देत कचऱ्याचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे ठोस आश्वासन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी दिले.


