वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची आज बांधावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. सरकार तुमच्यासोबत असून लवकरात लवकर तुम्हाला मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी शेतकऱ्यांना दिली.
वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून या गरीब शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला. या पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच वनकुटे मधील पडझड झालेल्या २२ कुटुंबाना तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घरकुल घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले.
अवकाळी पावसाने या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, या शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी दिली.
शेतकरी बांधवांशी बोलताना, पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवडाभरात नुकसान भरपाई देऊ असे सांगून आश्वस्त केले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला १० किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही केले.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर, शिवसेना ,भाजपा चे स्थानिक पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.