कापूस पीकावरील डोमकळीवर उपाययोजना करण्याचे आवाहन

0
कापूस पीकावरील डोमकळीवर उपाययोजना करण्याचे आवाहन
     
        उस्मानाबाद,दि.06(जिमाका):- कापूस पीकावरील अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते आणि आतील भाग पोखरते. गुलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फूले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच डोमकळी म्हणतात. या डोमकळीवर कृषी विभागाच्या सूचनेप्रमाणे उपाय योजना कराव्यात असे आवाहन पुणे येथील कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.



       पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळयांना लाळेद्वारे एकमेकांना जोडून स्वतःला स्वरक्षणासाठी बंद करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्या म्हणजेच डोमकळया. डोमकळया तोडून पाकळयांना वेगळे केल्यास, पाकळया एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात. बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते. या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंड्यातून निघालेली अळी,ताबडतोब पाते, कळ्या, फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते.


          गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामधे नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. या फुलामधून किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो. अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस आणि सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये फक्त सरकीवर आक्रमण करते. एक अळी बोंडामधील तीन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात. प्रादूर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रूईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.


कापूस पीकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन,  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो आणि कापूस पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बंधूंना कापूस पीकातील डोमकळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


डोमकळीचे नियंत्रण करण्यासाठी डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही आणि प्रादुर्भाव होण्याच्या मूळ कारणाला आळा घालता येईल. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे.) शेतामध्ये लावावेत. कामगंध सापळे 10 प्रती हेक्टरी लावावेत.
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार प्रोफेनोफॉस 50 ई.सी. किंवा 30 मिली/10 लिटर,  थायोडीकार्ब 75 डब्ल्यु. पी. किंवा 20 ग्रॅम/10 लिटर तसेच इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस. जी. 4 ग्रॅम/10 लिटर या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, असेही आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top