भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत महात्मा जोतिबा फुले यांची जयंतीसमाज कल्याण तर्फे उत्साहात साजरी
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.11 (जिमाका):-सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.
06 ते 16 एप्रिल असे 10 दिवस राज्यासह उस्मानाबाद जिल्हयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम आयोजिक करण्यात येत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास सामाजिक न्याय विभागातर्फ अभिवादन करण्यात येत आहे.
आज दि. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीचे आयोजन आणि त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार हा कार्यक्रम आर. पी. फार्मसी महाविद्यालय, गडपाटी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य काझी होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती हायस्कूल मधील श्री. सुरवसे उपस्थित होते. त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन व त्यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी केलेले अथक प्रयत्न बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बी.एड, कॉलेज चे प्राचार्य श्री. मोटे यांनी महात्मा फुले यांचे धर्म व जातीयता याबाबत विचार कसे होते याबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील काही विद्यार्थीनींनीसुध्दा महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांवर भर देऊन आपण वाटचाल केली पाहिजे, असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले, यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सुरज ननवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण कार्यालयातील कपिल थोरात, अमोल कातंगळे, आणि रामभाऊ गुरव हे उपस्थित होते.