उस्मानाबाद, दि. 22 (प्रतिनिधी)- जमात-ए-इस्लाम हिंद, महाराष्ट्रच्यावतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ही मोहिम शनिवार, 22 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी उस्मानाबाद शाखेच्यावतीने अंधारातून प्रकाशाकडे या मोहिमेला सुरूवात करण्यात आली.
जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्या कार्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर कदम, दादासाहेब जेटीथोर, मसूद शेख, रणजित रणदिवे, नामदेव वाघमारे, शाहनवाज सय्यद, सजियोद्दीन शेख उपस्थित होते.
यावेळी सिकंदर पटेल यांनी जमात-ए-इस्लाम हिंदची ही मोहिम आज आपल्या मानवी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नैतिक मुल्यांचा जो र्हास होत चालला आहे. तो थांबविण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. मानवी समाजात अंधःकारमय झाले आहे. भौतिक साधनांच्या प्राप्तीसाठी तो नैतिक मूल्ये पायदळी तुडवित आहेत. यामुळे समाजामध्ये अनिष्ठ प्रथा, व्यसनाधीनता, रूढी-परंपरा वाढत चालल्या आहेत. या अंधःकारातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, व समाजात नैतिक मूल्ये कशाप्रकारे स्थापित करता येतील, याचा उहापोह करण्यासाठी जनसामान्यांशी संवाद या मोहिमेतून साधला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सिकंदर पटेल यांनी तर सूत्रसंचालन शेख रियाज यांनी केले. या कार्यक्रमास जमात-ए-इस्लाम हिंदचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.