दक्षिण राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे . पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे . दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे . पुढील काही दिवसांत याचं चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे .
यामध्ये पुणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सातारा , सांगली , कोल्हापूर , अहमदनगर , सोलापूर , उस्मानाबाद , बीड , लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे . पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे . आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे . पुढील पाच दिवस कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे .