वाचन-मनन-चिंतन आणि अभ्यासाच्या नावाखाली मुळ मुद्याला बगल देऊन चालढकल करणे हा भाजप आमदार राणा पाटलांचा उद्योग - प्रशांत नानासाहेब पाटील
उस्मानाबाद ;-
पीक विमा संदर्भात केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्यांनी आपले वाचन वाढवावे असा अनाहूत सल्ला देणाऱ्या भाजप आमदार राणा पाटील यांनी आजपर्यंत वाचन-मनन-चिंतन आणि अभ्यासाच्या नावाखाली मूळ मुद्याला बगल देने आणि चालढकल करणे हाच उद्योग केलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केला आहे.
पीक विमा योजनेच्या कार्यप्रणालीतील मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावल्यामुळे शेतकऱ्यांना पिकविम्याची नुकसानीच्या प्रमाणात अपेक्षित रक्कम मिळणार नाही असे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे म्हणणे आहे. असे असेल तर त्यासाठी जबाबदार कोण आहे? आणि जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर केंद्र शासनाने काय कारवाई केली याचीही माहिती या अभ्यासू आमदारांनी द्यावी.
विरोधकांना वाचन वाढविण्याचा सल्ला देणाऱ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेचे सर्व नेते "हीच ती वेळ" आणि "शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार" असा जाहीर प्रचार करत होते. अशा वेळी वाचन-श्रवण आणि अभ्यास केला असता तर पक्ष बदल करून स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ बदलून, निवडून येऊनही विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली नसती. त्यांच्या प्रचंड अभ्यासातून आणि व्यासंगातून आलेल्या "मोगली एरंडाच्या गुऱ्हाळापासून ते गुळपावडर च्या गुऱ्हाळापर्यंत" आणि डेक्कन जिनिया ते तुळजाई शुगर पर्यंतचा विकास पाहून उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता धन्य झाली आहे.
त्यामुळे वाचन वाढविण्याची गरज नेमकी कोणाला आहे? हे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचा वाढीव पीकविमा सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अनेकांचा पाठपुरावा सुरू आहे. तो लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.
त्यानंतर ज्यांना प्रत्येक बाबीचे श्रेय घेण्याची सवय आहे त्यांनी जरूर तसा प्रयत्न करावा, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच वाचन वाढविण्याचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रशांत नानासाहेब पाटील
उपाध्यक्ष
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी