सामाजिक भान जपत शिर्डी संस्थानने ही मदत केली आहे
शिर्डी साईबाबा संस्थानने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ कोटी रुपये दिले आहेत. राज्यावर करोनाचं संकट आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देशात लॉकडाउन आहे. त्यामुळेच शिर्डी साईबाबा संस्थानने ५१ कोटींची मदत राज्य सरकारला केली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १२५ वर गेली आहे तर देशभरात ७०० वर ही संख्या जाऊन पोहचली आहे. देशाचा विचार केला तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवरच शिर्डी संस्थानने ही मदत राज्या सरकारला केली आहे.करोनाचं संकट दूर होण्यासाठी लॉकडाउन देशभरात पाळण्यात येतो आहे. तसंच महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशात हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला आहे. नेमकं पोट कसं भरायचं या विवंचनेत ते आहेत. त्यामुळे राज्यात असलेले अनेक उद्योजक जसेकी टाटा, गोदरेज, अंबानी यांनी राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. आता ठाकरे सरकारला मदतीचा हात देण्यासाठी शिर्डी सरकारनेही पुढाकार घेतला आहे. ५१ कोटीची देणगी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे.