केंद्र सरकारकडून पंजाबराव देशमुख योजनेला मिळणारे अर्थसाह्य पूर्ववत ५ टक्के देण्यात यावे अशी केंद्रीय मंत्री मा. डॉ. भागवत कराड यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे साकडे
Osmanabad :-
महाराष्ट्र सरकारच्या पंजाबराव देशमुख योजनेला केंद्र सरकारकडून मिळणारे 5 टक्के अर्थसाह्य पूर्ववत देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतजी कराड साहेब यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद हा एक जिल्हा आहे. मराठवाड्यातील मागासलेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळेच शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नसल्यामुळे आर्थिक समस्येचा ताण वाढतो. त्यामुळे पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शेतकऱ्यांना विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जावर केंद्र सरकारकडून पाच टक्के अर्थसाह्य मिळत होते. परंतु केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसाह्यात दोन टक्क्यांची घट होऊन सध्या फक्त तीन टक्के अर्थसाह्य मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे 3 आणि राज्य सरकारचे 3 टक्के अर्थसाह्य शेतकऱ्यांना मिळत आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे 5 टक्के अर्थसाह्याची तरतूद केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून पूर्वीप्रमाणे 5 टक्के अर्थसाह्य मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्याबरोबर बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होईल. त्यामुळे पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसाह्य पूर्वीप्रमाणे 5 टक्के ठेवण्याबाबत उचित निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा घाडगे-पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने विविध मागण्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतजी कराड साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
मराठवाड्यातील बँकांचा अनुशेष दूर करावा
मराठवाड्यातील बँकांचा व आर्थिक अनुशेष पुर्ण करण्यासाठी बँकांच्या शाखांचा विस्तार करण्यात यावा, इतर प्रदेशांमध्ये 5000 नागरिकांमागे एक बँक असून त्या तुलनेत तुलनेत मराठवाड्यामध्ये हे प्रमाण 10000 नागरिकांसाठी एक अशी परिस्थिती आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या स्तरावर निर्णय घेऊन ही
तफावत दूर केल्यास मराठवाड्यातील नागरिकांना सुलभ कर्ज उपलब्धता, शेतकऱ्यांना पीककर्जाबरोबर इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवहाराला देखील गती प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे मराठवाड्यातील बँकांचा अनुशेष दूर करण्यासाठी बॅकांच्या शाखांचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कृषी प्रक्रिया उद्योग कर्जासाठी अटी शिथील करा
प्रधानमंत्री अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग, गोदाम बांधकामासाठी कर्ज मागणीसाठी गेल्यास बँकांकडून अकृषिक मालमत्तेची अट ठेवली जात आहे. या अटीमुळे कृषी कंपन्यांना कर्ज मंजूर होत नाही. म्हणून ही अट शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा, शैक्षणिक कर्जासाठी देखील मालमत्ता तारणाची अट बँकेकडून ठेवली जाते. याबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध उद्योगांना अर्थसाह्य करण्यात यावे
आकांक्षित उस्मानाबाद जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्यामुळे या भागाचा औद्योगिक विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी लहान शेतीपूरक उद्योग करत आहेत. यापैकीच एक शेळीपालन हा व्यवसाय आहे. उस्मानाबादी शेळी मांस आणि कातडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट (क्लस्टर) निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील कातडी बाजाराला विशेष अर्थसाह्य उपलब्ध करुन द्यावे, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात पशुपालन केले जात असल्यामुळे दुग्ध प्रक्रिया करणारे लहान व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यामार्फत दुधापासून खवा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करुन शेतकऱ्यांना अर्थसाह्य उपलब्ध करुन द्यावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ऊस साखर आणि गूळ पावडर कारखान्यांना पाठवला जातो. त्यामुळे गुळपावडर निर्मिती व विक्रीसाठी अर्थसाह्य उपलब्ध व्हावे याकरिता भारतीय स्टेट बँकेसह अन्य बँकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, शहरप्रमुख संजय मुंडे, न. प. गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, सिद्धेश्वर कोळी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, अभिजीत देशमुख, दिलीप जावळे, बंडू आदरकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, हनुमंत देवकते, मुकेश पाटील, गणेश असलेकर, धनंजय इंगळे, मनोहर धोंगडे, अजय धोंगडे, राकेश सूर्यवंशी, सत्यजीत पडवळ, शिवयोगी चपने, शिवप्रताप कोळी, भीमा जाधव, महेश लिमये, योगेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.