पळसप कब्रस्तानसंबंधी तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका पूर्वग्रह दूषितपणाची ! , शव दफन करण्याची मनाई उठविण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

0

पळसप कब्रस्तानसंबंधी तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका पूर्वग्रह दूषितपणाची !

शव दफन करण्याची मनाई उठविण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप कब्रस्तानसंबंधी उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका पूर्वग्रह दूषितपणाची आहे. त्यांच्याकडून अल्पसंख्य मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नसल्याची भावना मुस्लिम समाजाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासनाच्या अन्य प्रतिनिधींना कळविली असून तहसीलदार गणेश माळी यांनी शव दफन करण्यास केलेली मनाई उठविण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे पळसप येथे मुस्लीम समाजासाठी दफन विधी करण्यासाठी अत्यंत जुने असे वक्फ बोर्डाचे मालकीचे कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानमध्ये शांततेने दफन विधी होत आला आहे. या कब्रस्तानमध्ये काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पत्र्याचे शेड मारून व्यवसाय गाळे सुरू केले. ते गाळे हे कब्रस्तानच्या हद्दीत येत असल्यामुळे याबाबत आम्ही रितसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी, निर्देश केल्याप्रमाणे उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी यांनी पळसप गांवी येऊन एका गटाशी चर्चा करून ग्रामपंचायतीने बनवलेले गाळे थांबवण्याऐवजी पुढील आदेशापर्यंत थेट कब्रस्तानमध्ये दफन करण्यास तोंडी मनाई केली, त्यावेळी त्यांनी कब्रस्तानसंदर्भात वक्फ बोर्डाचे कागदपत्रे बघण्यास नकार दिला.

तीन दिवसापूर्वी समाजातील ८५ वर्षीय अल्लाबक्ष यासीन शेख यांचं निधन झाले. त्यांचं शव कब्रस्तानमध्ये दफन करण्यास मनाई असल्यामुळे प्रेत दफन कोठे करायचे, असा मोठा प्रश्न पळसपच्या मुस्लीम समाजासमोर होता. समाजातील काही लोकांनी तहसिलदार माळी यांना फोन करून प्रेत कोठे दफन करायचे, अशी विचारणा केली. त्यावर तहसिलदार  यांनी त्या कब्रस्तानमध्ये प्रेत दफन करावयाचे नाही, असे पुन्हा बजावले. त्यावेळी समाजात असंतोष पसरून तणाव निर्माण झाला.

ते शव समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचे निश्चित केले. तेव्हा तहसिलदार माळी यांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लाऊन त्या ठिकाणी पोलीस उपअधिक्षक मोतीचंद राठोड व दंडाधिकारी योगेश खरमाटे आणि तहसिलदार माळी स्वतः गावात आले. तणावाच्या परिस्थितीत चर्चा होऊन मुस्लीम समाजातील उस्मानाबाद येथील आलेल्या दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी समाजाची बैठक घेऊन मुस्लीम समाजाला समजावलेनंतर प्रेत वादग्रस्त जागी न दफन करता दुसऱ्या बाजुला कब्रस्तानमध्ये दफन करावयाचे ठरवले, परंतु त्यासही सुध्दा तहसिलदारांनी आडकाठी आणून तेथे सुध्दा दफन करावयाचे नाही, असे सुनावले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण होऊन परिस्थिती अत्यंत गंभीर बनली.

यावेळी उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे व पोलीस अधिक्षक राठोड यांनी योग्य न्यायाची भुमिका घेऊन प्रेत दुसऱ्या बाजुच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्याची परवानगी दिली व दफन विधी सुरळीत पार पडला, त्यावेळी पुढे निर्माण होणारा मोठा अनर्थ टाळला.

याप्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांची भूमिका राजकीय भावनेने प्रेरित असून ते एखाद्या पक्षाचे राजकीय हस्तक म्हणून काम करीत असल्याची भावना पळसप गावातील अल्पसंख्य मुस्लिम समाजाची बनली आहे. याप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री अल्पसंख्याक मंत्री आणि उस्मानाबादचे पालक मंत्री यांना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top