ऑक्टोबर मधील अतिवृष्टीचा अहवाल तरी तातडीने केंद्र सरकारकडे पाठवा - आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री ना.ठाकरे यांच्याकडे मागणी
उस्मानाबाद :-
जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने सप्टेंबर मध्ये केंद्राकडे पाठविला, केंद्राने तात्काळ दखल घेत,१५ दिवसाच्या आत केंद्रीय पथक पाठवून पाहणी केली. परंतू केंद्रानेच उशीराने पथक पाठविल्याची प्रसिध्दी झाल्याने केंद्र सरकार बद्दल नाकारात्मक भुमिका निर्माण झाली. त्यामुळे नुकसानीच्या माहितीचा अहवाल पाठविण्यात होत असलेली दिरंगाई टाळण्यासाठी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब यांनी यामध्ये स्वत: लक्ष द्यावे व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ केंद्र सरकारला पाठवावा, अशी विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे. तसेच केंद्राकडे अहवाल गेल्यानंतर विरोधी पक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस व इतर आमदारांच्या माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा विश्वास देखील दिला आहे.
यावर्षी अगदी एप्रिल पासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे, घरांचे व दुकानांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. दुर्दैवी जिवीतहानीच्या घटना देखील याअनुषंगाने घडल्या आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून स्थायी आदेशा प्रमाणे मदत निधी देण्यात येतो. हा निधी केंद्र व राज्य सरकार कडून समान हिस्याने दिला जातो, ही प्रचलीत कार्यपद्धती आहे.
केंद्र सरकारकडून अधिकचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य सरकारला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करावा लागतो, हे या प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव श्री. असीमकुमार गुप्ता व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या झालेल्या चर्चे दरम्यान असे निदर्शनास आले आहे कि, ऑक्टोबर २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या माहितीचे राज्यभरातून संकलन अजुनही अपुर्ण आहे. ही प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या स्तरावरून आढावा घेणे व कालमर्यादा आखून देणे गरजेचे आहे.
जुलैमध्ये झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकार कडुन केंद्र सरकारकडे मोठ्या विलंबाने दि. २२/०९/२०२१ रोजी देण्यात आला. या नंतर १५ दिवसाच्या आतच केंद्रीय पथक गठित करूण पाहणीसाठी दि. ५/१०/२०२१ रोजी आले होते. परंतु राज्य सरकार कडुनच नुकसानीचा अहवाल पाठवायला वेळ लागला, हे जनतेला माहित नसल्यामुळे केंद्र सरकारबाबत नकारात्मक भावना निर्माण झाली.
त्यामुळे ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीचा अहवाल तरी केंद्र सरकारकडे तातडीने जावा यासाठी या अतिशय महत्वाच्या विषयात मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी व्यक्तीगत लक्ष देण्याची विनंती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्या नंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून राज्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील दिली आहे.